Home » महाराष्ट्रातील किल्ले » दुर्गदुर्गेश्वर रायगड

दुर्गदुर्गेश्वर रायगड

हाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते ती आता रोप-वे मुळे लहानांपासून अबाल वृद्धांच्या आवाक्यात आली आहे.

रायगड किल्ल्याची ऊंची: २९०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
डोंगररांग: रायगड
जिल्हा: रायगड
तालुका: महाड

इतिहास

रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे.

१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्‍यांचा धुव्वा उडवला. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,
[quote]राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.[/quote]

याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे
१) रायगड २) रायरी ३) इस्लामगड ४) नंदादीप ५) जंबुद्विप ६) तणस ७) राशिवटा ८) बदेनूर ९) रायगिरी १०) राजगिरी ११)भिवगड १२) रेड्डी १३) शिवलंका १४) राहीर १५) पूर्वेकडील जिब्राल्टर

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.

गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत…:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.

कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की,

शिवाजी राजाने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.

इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.

रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु…:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर लिहितात, ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.

पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु ७, इ.स १६८१, १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.

इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.

औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले.

झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ’इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

पाहाण्याची ठिकाणे

१) पाचाडचा जिजाबाईंचा वाडा:
उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ’तक्याची विहीर’ असेही म्हणतात.

२) खुबलढा बुरूज:
गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ’चित्‌ दरवाजा’ म्हणत. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३) नाना दरवाजा:
या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४) मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा:
चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५) पालखी दरवाजा:
रायगडावरील मनोर्‍यांच्या (स्तंभांच्या) पश्चिमेस तटबंदीत ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

६) राजभवन:
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आ.हे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

७) रत्नशाळा:
राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

८) राजसभा:
महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ’तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

९) नगारखाना:
सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१०) बाजारपेठ:
नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ’होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

११) शिरकाई देऊळ:
महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ शिर्काई ही गडावरील मुख्य देवता होय.

१२) कुशावर्त तलाव:
होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

१३) टकमक टोक:
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.

१४) हिरकणी टोक/बुरुज:
गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

१५) महादरवाजा:
महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

१६) चोरदिंडी:
महादरवाजा पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी (चोर दरवाजा) बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

१७) गंगासागर तलाव:
हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

१८) हत्ती तलाव:
महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. या तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. आज हा दगड नसल्यामुळे तलावात पाणी साठत नाही.

१९) स्तंभ:
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. पूर्वीच्या काळी हे मनोरे पाच मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

२०) मेणा दरवाजा:
पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल. राण्याच्या महालात असलेले शौचकुप पाहाण्यासारखे आहेत. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

२१) जगदीश्वर मंदिर:
बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो, सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुळकर

या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:

श्री गणपतये नम…: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते… शिवस्यनृपते… सिंहासने तिष्ठत…:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे… कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावƒन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।

याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्‌ छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.

२२) शिवाजी महाराजांची समाधी:
मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते,

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.

दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२३) वाघदरवाजा:
कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की,

किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.

हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

पोहोचण्याच्या वाटा

१) मुंबई – गोवा मार्गावरील महाड बस स्थानक:
मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात. तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १४०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

२) नाना दरवाजा:
नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास नाना दरवाजाने आपण गड चढू शकतो.

३) रोप-वे:
आता गडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहोचू शकतो.

राहाण्याची सोय:
रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एमटीडीसीच्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते.

रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई २१ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल. पायथ्याच्या पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन (९५२१४५) ७४८४८, ७४८६६.

जेवणाची सोय: गडावर हॉटेल्स आहेत, तेथे जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय: बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायर्‍यांच्या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास १ तास लागतो.

माहिती साभार: किशोर धर्माधिकारी

हाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते ती आता रोप-वे मुळे लहानांपासून अबाल वृद्धांच्या आवाक्यात आली आहे. रायगड किल्ल्याची ऊंची: २९०० फुट किल्ल्याचा प्रकार:…

Review Overview

User Rating !

Summary : शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.

User Rating: 4.34 ( 8 votes)

6 comments

  1. tanaji dhavane

    खुप छान …..

  2. lay bhari………

    jay jijau jay shivray………

  3. suvarna phadnis

    khup chan mahiti dili aahe . sanyojkanche manapasun aabhar . dhany shivray an dhany tyanchi durdrushti.

  4. निलेश जाधव

    छान माहिती, इतर किल्ल्यांची माहिती टाका

  5. Jai Shivray _/\_ thnx for information.. nice click keep posting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. ...